शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१२

ब्लॉगर्सचा मेळावा .... माझं रक्तदान

खरंतर खूप दिवस झाले या गोष्टीला. दिवस कसले महिने झालेत. आणि आज लिहितोय मी त्या घटनेबद्दल. शिळ्या वर्तमान पत्रासारखं वाटेल आज हे सारं वाचताना. वेळ नव्हता लिहायला असं नाही. पण नेट आणि संगणक या सुविधा नव्हत्या माझ्याजवळ. आणि आणखीही काही वर्ष नसतील त्या. शेतावरून पुण्यात आल्यावरच लिहिणं शक्य होतं मला.मग तुम्ही म्हणाल ७ जुलैला घडलेल्या त्या घटनेनंतर तुम्ही आलाच नाहीत का पुण्यात ? आलो होतो. पण अत्यंत घाईत. आलो त्या पावली परत गेलो होतो.
घटना गंभीर नव्हती.
ब्लॉगर्सचा मेळावा होतं पुण्यात. indiblogger या ब्लॉगर्स डिरक्टच्या पुण्यातील सभासदांचा मेळावा. मला निमंत्रण होतं. केवळ तेवढ्यासाठी गावाहून पुण्यात आलो. दुसऱ्यादिवशी ठरल्याठिकाणी पोहचलो. तर तिथ चक्क एक लग्न समारंभ. चौकशी केली तर कळलं त्या ठिकाणी ब्लोगार्सचा मेळावा नव्हताच. पण माझ्या जवळचा पत्ता बरोबर होता . आणि मी योग्य ठिकाणीच पोहोचलेलो होतो. मग गफलत कुठं झाली होती काही कळत नव्हतं. काय करावं काही सुचेना. त्याच इमारतीच्या बेसमेंटला रक्तदान शिबीर भरलं होतं. म्हणलं, " चला रक्तदान करून घरी जाऊ."

पण ब्लॉगर्सचा मेळावा गेला कुठे ? हा प्रश्न होताच. इकडं तिकडं पहाताना बेसमेंटलाच एक ऑफिस दिसलं. सरळ आत शिरलो. प्रवेश द्वाराच्या आतल्या बाजूला डाव्या हाताला स्वगातोस्तुक महिला बसली होती. तिला मी



माझी अडचण सांगितली आणि  indibloggar वरचं माझं अकाउंट उघडायला सांगितलं. त्यांनीही सौजन्य दाखवलं. मला हवं असलेलं पान समोर आलं आणि पाहिलं तर मी काल सकाळी पाहिलेला पत्ता आज बदललेला होता. ऐवी ना तेवी उशीर झालाच होता. म्हणलं, " आता रक्तदान करू आणि मग नव्या ठिकाणाचा शोध घेवू."

रक्तदान केलं. छाती काढून तिथून बाहेर पडलो. आणि नवा पत्ता शोधत ब्लॉगर्सच्या मेळाव्यास उपस्थित राहिलो. साधारणतः पन्नासएक ब्लॉगर्स मेळाव्याला उपस्थित होते. त्यात विशीपासून ते साठीपर्यंतचेही होते. डॉक्टर्स होते. इंजिनिअर्स होते,    indibloggar च्या डिरक्टरीत जवळ जवळ 2000 हून अधिक मराठी ब्लॉगर्स ( मराठीत लिहिणारे ) सभासद आहेत. त्यातील ५० हून अधिक पुण्यातील आहेत तरीही मेळाव्यास मात्र मराठीतून लिहिणारा आणि कथा , काव्य आणि ललित या विषयाला वाहिलेला मी केवळ एकटाच उपस्थित होतो. मन थोडसं खट्टू झालं. पण लवकरच खुललं. कारण सारेच एकमेकांना फार सन्मानाची वागणूक देत होते.

 आयोजकांचं कौतुक वाटलं कारण केवळ मेळाव्याच्या केवळ २४ तास आधी पहिल्या ठिकाणच्या मालकांनी जागा नाकारल्यानंतर लगेच दुसरा हॉल शोधून आयोजकांनी मेळावा यथासांग पार पाडला आणि म्यानेजमेंट काय असतं याचा एक धडा घालून दिला.    

लक्षात राहिला तो दिवाकर. हिंदीत गझल लिहिणारा, लक्षात राहिले ते नेव्हीतून सदिच्छा निवृत्ती घेतलेले कर्वेसाहेब. लक्षात राहिले ते एन विशीत ब्लॉगिंग क्षेत्रात पाऊल टाकून भरीव काम करणारे निखील आणि सौरभसारखे तरुण. घरी परतलो ते खूप हलका हलका होऊन. कारण.......... इथं आल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढं केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा